Friday, May 16, 2008

KAVITA

करता कविता...
"हा घ्या माझा कवितासंग्रह'', तब्बल ज्ञानेश्वरी ग्रंथाइतके जाड पुस्तक माझ्या हातात सोपवत एक कवी म्हणाले."लहानपणापासूनच करता का कविता?'',

मी आश्चर्याने विचारले. "या फक्त गेल्या वर्षभरातल्याच कविता आहेत. एकूण सातशेतीस, रोज दोन या हिशोबाने,''

ते म्हणाले..बापरे! शारदादेवीचा वरदहस्त लाभलेल्या त्यांच्या शिराकडे आदराने बघून मी घरी आलो खरा, पण त्यानंतर त्यातील कविता वाचून मला सडकून (कवि) ताप भरला होता...

कविता करणे म्हणजे लेखनकलेतील सर्वांत सोप्पा प्रकार.., अशी काहींची समजूत झालेली असते. थोडे इकडचे तिकडे व तिकडचे इकडे शब्द फिरवले की झाले काव्य, या समजुतीतून काहींच्या काव्यगिरणीतून कविता पडत असतात..

(अगदी सर्र्रर्र्रर्र..Captain Cook !)प्रसिद्ध कवींची एखादी रचना घेऊन त्यातील शब्दांची मोडतोड करून आपले शब्द टाकून सरळ सरळ एखादी नवी कविता निर्माण केल्याचा आभास काही जण निर्माण करतात.

"भंगुनी भंगात सार्‍या भंग माझा वेगळा'' अशी एका कवीने केलेली रचना वाचल्यानंतर कोणीतरी भारी मोबाईलचा हॅंडसेट चोरून त्यातले सिमकार्ड काढून त्यात आपले कार्ड टाकून वर जणू आपलाच फोन आहे, असे भासवून उजळ माथ्याने मिरवत आहे असे वाटले! काही ठराविक शब्दांचा वापर तर कवितांमध्ये अनेकदा होतो.

उदाहरणार्थ "खुळा' हा शब्द! सततच्या वापराने त्याचा पार खुळखुळा झालेला आहे. खुळ्या वाटा, खुळ्या लाटा, इतकंच काय खुळा चहा, खुळी कॉफी, खुळी साखर, खुळा गॅस, सगळंच खुळं! काही विशेषण सापडले नाही की घाल शब्द खुळा. जणू वाचक दुधखुळाच असतो!

"हळवा" हाही एक दुसरा शब्द. वापरून पार कडक झालेला. हळवी फुले, हळव्या कळ्या हे ठीक आहे. पण एकाने आपल्या कवितेत "हळवा बल्ब' असे म्हणून विजेवर चालणाऱ्या दिव्याला कोमल बनवलं होतं.

कवितेमध्ये यमक हे असलंच पाहिजे अशीही काहींची भ्रामक कल्पना असते. मग भले पहिल्या ओळीचा दुसऱ्या ओळीशी संबंध नसला तरी चालेल. "एकदा मी लाडू फोडत होतो कडक गाडीला बसली म्हशीची धडक'' कडकला धडक जोडून केलेली ही रचना अशी खडक झालेली आहे.

वारा म्हटले की गारा येणार, गारा म्हटले की पारा येणार. त्यापाठोपाठ थारा येणार. असा वारा-गारा-पारा-थारा या साखळीवजा पर्जन्यअस्त्राचा मारा केल्याशिवाय काहींच्या कवितांमध्ये पाऊस मुळी पडतच नाही. जगात कुठेही, कोणतीही आपत्ती येवो. त्यापाठोपाठ कवितांची आपत्ती जरूर येत असते.
मागे सुनामी आपत्तीनंतर जो काही कवितांचा पूर आला त्याला थोपवावे कसे या विचारांनी माझी एक संपादक मैत्रीण अगदी शिणून गेली होती. मुक्त काव्य म्हणजे काय, तर कविता कशीही चालविण्याचा सुप्त परवाना! मुकी बिचारी कशीही हाका!
या स्वैर संचारात नियमांना कोण विचारतोय? ना छंदाचा फंद, ना वृत्ताचा ताळेबंद, कसेही फिरा आणि कुठेही फिरा स्वच्छंद! एकदा एका कवीने,
"हिरवा प्रकाश जेव्हा फक्त पांढर्‍या धरतीवर उतरतो तेव्हा लाल पाण्याचे किती हाल होत असतील? असा विचार करून मी काळा ठिक्कर पडलो आहे. आता तोच डांबरी चेहरा घेऊन मी फिरतोय रस्तो रस्ती''. वस्तूंचे असे नैसर्गिक रंग बदलून स्वतःचा वेगळाच रंग दाखविणारी कविता केली होती.
"समुद्राच्या किनाऱ्यावर पाहिली मी वडाची झाडे-(माडाची नव्हे!) किती मासे खेळत होते त्यावर सुरपारंब्या.. (जिवंत होते ते पाण्याबाहेर?) मी विचारलं त्या माशांना काळचक्राचं गणित... (बापरे!) ते म्हणाले, "मीनयुगात जमीन हेच आमचं घर!'' (ही बहुधा काळाच्या खूप पुढची कविता असावी-) काही कवी तर कवितेत सतत प्रश्न विचारतात-

"मी बंधार्‍यावर बसलो होतो शेतात तितक्यात तिथे विमान घुसले वेगात नांगर चालवणारा मी विमान कसे चालवू? मळ्यात फिरणारा मी आकाशात कसे बागडू?

दगड वेचणारा मी चांदण्यांना कसे लगडू? भावाशी भांडणारा मी चंद्राशी कसे झगडू? असे प्रश्नांवर प्रश्न असलेली ही कविता! ..शोधत बसा त्याची उत्तरे...!!

एकदा मात्र एकाने, "तुम्हाला कोणी सांगितलंय आकाशात विमान चालवून बागडा म्हणून?'' असा उघड उघड प्रतिप्रश्न करून त्या कविराजांना भर मैफलीत निरुत्तर केले होते.

साहित्य संमेलनातील कविसंमेलने म्हणजे तर कवींच्या काळजाच्या कळीचा मुद्दा. कविता ऐकणाऱ्या सुजाण, सहनशील श्रोतृवर्गापुढे कविता वाचायची संधी मिळणे यासारखा दुसरा परमानंद कोणता?

अर्थात प्रेक्षकांमधील नव्वद टक्के लोक आपापल्या कविता सादर करण्यासाठी आलेले विचारी जन असतात. इतर आठ टक्क्यांमध्ये माईकवाले, लाईटवाले, सतरंजीवाले ही बिच्चारी जनता आणि उरलेल्या दोन टक्क्यांमध्ये कवींना आवरणार्‍या कार्यकर्त्यांची अति बिच्चारी जनता!

बंड, क्रांती, संघर्ष, विद्रोह, साधेप्रेम, देशप्रेम, बेरोजगारी, दुष्काळ, भूकंप, पूर यासारख्या विषयांवर केलेल्या कविता त्याला भावानुरूप वाचायच्या म्हणजे संमेलनात गडबड गोंधळ होणारच! पण एकदा एका कविसंमेलनात, मी थुंकतो तुमच्या घरादारावर, धनसंपत्तीवर मी थुंकतो तुमच्या भारी शर्टावर, भरजरी साडीवर मी थुंकतो भरवस्तीत, हमरस्त्यावर, नाक्यावर...

अशी थुंकून थुंकून थुंकीचा सडा टाकणारी कविता एका कवीने वाचली होती. तेव्हा मात्र प्रेक्षागृहात एकदम शांतता पसरली होती. सर्वजण सावध झाले होते, न जाणो हा पटकन् (का पचकन?) आपल्या अंगावर थुंकायचा! अशा संमेलनात कविता वाचणार्‍यांची संख्या व दिलेला वेळ यांचे गणित कधीच जुळत नसते. देशप्रेमावरील कविता सादर करताना एका कवीने, माती माझी, मी मातीचा, दगड माझे, मी दगडांचा पाणी माझे, मी पाण्याचा, लोखंड माझे, मी लोखंडाचा...

अशी चराचरातील सर्व वस्तूंशी नाते जोडणारी कविता एकोणीस मिनिटे वाचली होती. काही लोक बाहेर जाऊन चहा फराळ करून आले तरी यांचा अद्वैतवादाचा सिद्धांत संपला नव्हता. शेवटी "देश माझा, मी देशाचा'' अशी प्रेक्षागृहात कोणीतरी आरोळी ठोकल्यावर हे महाशय खाली बसले. "विश्व माझे, मी विश्वाचा'' असेच एकदाचे का म्हणून टाकत नाहीत, म्हणजे कविता करण्याचा विषयच संपला!

सरतेशेवटी असाही सल्ला मागून कोणीतरी दिलाच. "जे न देखे रवी, ते देखे कवी'' असे म्हटले जाते - ते असेलही खरे....

परंतु .. जे जे देखे कवी त्याची दरवेळी कविताच का व्हायला हवी?

No comments: